Beed News Barshi Naka | बीड शहरातील बार्शी नाका ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गावरील मुख्य रस्ता खोडून ठेवून तब्बल एक महिना उलटून गेला आहे, मात्र अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा कामाची गती दिसून येत नाही. या अर्धवट कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून, नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे इतकी धूळ उडते की समोरून येणारा माणूस किंवा वाहनसुद्धा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शाळकरी मुले, वयोवृद्ध आणि कामावर जाणारे नागरिक यांना रोज या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “रस्ता खणून ठेवला आहे, पण पुढचे काम सुरूच नाही. आम्ही रोज धुळीत जगतोय,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली.

यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “आमदार आणि खासदार झोपले आहेत का?” असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही होत आहे.
सम्बंधित ख़बरें

नगर परिषद प्रशासनाने तातडीने या कामाकडे लक्ष देऊन रस्ता पूर्ण करावा, तसेच दरम्यान धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.