Iran Firing On Indian Oil Tankers | होर्मुजच्या समुद्रात भारतीय जहाजांवर इराणी गनबोट्सचा हल्ला; भारत आक्रमक, इराणच्या राजदूतांना बजावले समन्स

Iran Firing On Indian Oil Tankers

Iran Firing On Indian Oil Tankers| जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या ‘होर्मुज सामुद्रधुनी’मध्ये (Strait of Hormuz) युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी या मार्गावरून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर इराणी लष्कराच्या (IRGC) गनबोट्सनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, भारताने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूताला तातडीने पाचारण करून भारताने या कृत्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

नेमकी घटना काय?

काही दिवसांच्या तणावानंतर शुक्रवारी इराणने ‘गुड फेथ’ म्हणून हा सागरी मार्ग जहाजांसाठी मर्यादित स्वरूपात खुला केला होता. त्यामुळे गेल्या सात आठवड्यांतील आठ तेलवाहू टँकरांचा सर्वात मोठा ताफा या मार्गातून पुढे सरकत होता. मात्र, ही शांतता अल्पकाळ टिकली. ही जहाजे पुढे जाताच अचानक परिस्थिती बिघडली. युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या (UKMTO) माहितीनुसार, इराणी गनबोट्सनी या ताफ्यातील जहाजांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला.

व्हिडिओ पहा: 

भारतीय जहाजांना लक्ष्य केले

अनादोलू एजन्सी आणि टँकर मॉनिटरिंग डेटाच्या अहवालानुसार, ज्या दोन जहाजांवर कारवाई करण्यात आली ती दोन्ही भारतीय ध्वजाखाली नोंदणीकृत होती. यातील एका जहाजात सुमारे 20 लाख बॅरल इराकी तेल होते. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या भागात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाला या हल्ल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

Iran Firing On Indian Oil Tankers (1)
Image Credit : X


इराणची भूमिका आणि अमेरिकेवर आरोप

इराणने होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा करताना अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकन नौदल इराणी बंदरांभोवती नाकेबंदी करून ‘समुद्री दरोडेखोरी’ करत असल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका या भागातून हटवावी, तरच आम्ही मार्ग मोकळा करू, अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनीही शत्रूंना कडवा धडा शिकवण्याचा इशारा दिल्याने तणाव अधिकच वाढला आहे.

जागतिक तेल पुरवठ्यावर संकट

या वादाचा मोठा फटका जागतिक व्यापाराला बसत आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, इराणच्या या भूमिकेमुळे किमान 20 ते 23 जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला असून त्यांना ओमानच्या दिशेने वळवण्यात आले आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे कारण भारताची मोठी तेल आयात याच मार्गावरून होते.

भारत हाय अलर्टवर

आपल्या जहाजांवर झालेल्या या हल्ल्याला भारताने गांभीर्याने घेतले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणी राजदूतांची कानउघडणी केली असून, अशा प्रकारची कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिला आहे. सध्या भारतीय नौदल आणि संबंधित यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रातील हा वाढता तणाव कमी न झाल्यास येणाऱ्या काळात इंधनाचे दर आणि जागतिक अर्थव्यवस्था यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Icon Telegram Icon